राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती
सुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव), अभिनेते गौरव चोपडा (कला), अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार), श्री. रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), डॉ. भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय), डॉ. शेफालीताई भुजबळ (शैक्षणिक), श्री. दत्ता पाटील (साहित्य), श्री. चंद्रशेखर सिंग (उद्योग), श्रीमती संगीताताई बोरस्ते (कृषी), प्रा.नानासाहेब दाते (सहकार), कु. गौरी घाटोळ (क्रीडा) या पुरस्कारार्थींना सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुविचार गौरव हा नाशिकमधील अतिशय महत्वाचा पुरस्कार असून संपूर्ण महाराष्ट्राने या सोहळ्याची दखल घेतली आहे, असे विचार मांडले. आकाश पगार, त्यांच्या युवकांची टीम आणि इतर संस्था नाशिकच्या गोदावरीचे प्रदूषण रोखण्याचे आणि नाशिकचे नाशिकपण टिकविण्यासाठी अनेक संस्था नाशिकमध्ये काम करत आहेत. त्यांचे कौतुक केले.
यावेळी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा यांनी देखील समाजात चांगल्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून नाशिकमध्ये सुविचार मंच ही संस्था करत असलेल्या कामाचे कौतुक केले.
यावेळी नाशिकच्या स्थानिक कलाकारांनी मराठी, हिंदी गाण्यांवर विविध सामूहिक नृत्य व गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. दिलीप बनकर, आ. दिलिप बोरसे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, विष्णुपंत म्हैसधुणे, लक्ष्मण सावजी, राजेंद्र डोखळे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, डॉ. स्वप्नील तोरणे, प्रा . विनोद गोरवाडकर, प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी, सुविचार मंचचे ऍड. रवींद्र पगार आणि आकाश पगार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.